क्रांतिसूर्य
लिंगायत धर्म संस्थापक ,
महात्मा बसवेश्वर , विशेष लेख प्रा अजय शेटे
सातारा, दि.10 मे 2024 - शुक्रवारी दि.10 मे ,अक्षयतृतीया रोजी लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची 918 वी जयंती संपूर्ण भारतभर तसेच परदेशात पण साजरी होत आहे.प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेताना म.बसवेश्वर यांचे कार्य त्या वेळच्या व आजच्या पण वेळी किती महान आहे.हे आपणास दिसून येते.
प्राचीन काळापासून ' लिंगायत ' हा एक स्वतंत्र धर्म असून तो कोणताही धर्म,जात व पंथाची पोट शाखा नाही.हे आपणास सप्रमाण दिसून येते.स्वतंत्र असण्याची जी सर्व लक्षणे असतात ती सर्व लक्षणे या धर्माबाबतही दिसून येतात.या धर्माचे आराध्य दैवत श्री शिवशंकर/ महादेव हे असून सृष्टीच्या ' उत्पती - स्थिती - लय ' या सर्व क्रियांचे ते कारक आहेत.वीरशैव लिंगायत धर्माची शक्तिपीठे संपूर्ण भारतभर व परदेशात पण फार पूर्वीपासून असल्याची दिसून येतात.या मठ पिठातील वेदशास्त्र अभ्यासपूर्ण मठाधिश /मठाधिपती गुरु शिष्य परंपरा फार पूर्वीपासून प्रचलित आहे.या धर्माचा स्वतंत्र असा विजय ध्वज / विजय पताका फार पूर्वीपासून प्रचलित आहे.
इ. स.12 शतकाच्या पूर्वार्धात सन 1105 मध्ये कर्नाटक राज्यातील विजापूर जवळील इंगळेश्वर बागेवाडी येथे एका शैव कर्म उपासक कुटुंबात वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेला म.बसवेश्वर यांचा जन्म झाला.त्यांच्या वडिलांचे नाव मादिराज व आईचे नाव मदलांबिका असे होते.थोरल्या बहिणीचे नाव नागंबिका व भावाचे नाव देवराज असे होते.
वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या कुटूंब कर्मात त्यांचा उपनयन संस्कार करण्याचे ठरले.त्यावेळी त्यांच्या पेक्षा थोरली बहीण असलेल्या नागक्का हिचा उपनयन संस्कार झाला नाही आणि आधी आपलाच तो का केला जात आहे ? असा प्रश्न त्यांनी विद्वान शास्त्री पंडीत यांना विचारला असता ती स्त्री असून,तिला शूद्र स्थान आहे.असे शास्त्रकारांनी त्यांना सांगितले असता.समाधान कारक उत्तर न मिळाल्यामुळे व स्त्री ला समान दर्जाचे मानले जात नसल्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःच्या ही उपनयन संस्कारास विरोध करून तो टाळला.त्यांच्या मते प्रचलित समाजात आदिमाया स्त्रीला शूद्र स्थान असून तिला जर सर्व बाबतीत उपेक्षित ठेवली जात असेल तर तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पुरुषांना उच्च कसे समजायचे ? हा विरोधाभास सहन न झाले मुळे व आपल्या क्रांतिकारक विचारांमुळे कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग केला व ते पशुपात शैव ज्ञान भांडार असलेल्या कृष्णा व मल प्रभा नद्यांच्या संगमावर वसलेल्या व ईशान्य मुनींनी स्थापन केलेल्या ' कुडल संगम ' या तीर्थ क्षेत्री येवून राहिले.तेथून पुढे त्यांनी वेदशास्त्र , तत्वज्ञान व भाषा अभ्यास सुरू केला.
वयाच्या बाराव्या वर्षा पर्यंत सलग पाच वर्षे वेदाभ्यास केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मंगळवेढ्याच्या बिज्जळ राजाच्या पदरी असलेले त्यांचे मामा बलदेव यांनी त्यांचे लग्न आपली मुलगी गंगाबिका हिच्याशी लावून दिले . म.बसवेश्वर यांची विद्वत्ता पाहून राजाने त्यांना कारकून म्हणून राजकारभार करण्यास नेमले.पण आपल्या अंगभूत विद्वत्तेमुळे अल्पावधीतच त्यांनी राज्याच्या प्रधान पदापर्यंत मजल मारली.
तेथे त्यांनी सलग एकतीस वर्षे महान असे कार्य केले. व ' कल्याण ' ला राज्याची राजधानी बनवली.
येथेच त्यांनी आपल्या जीवनातील महान कार्य असलेली शरण चळवळ सुरू केली .त्या चळवळीत अग्रज ते अंत्यज अशा सर्व घटकांना त्यांनी सामील करून घेतले.स्त्री पुरुष समानतेचे तत्व अंगिकारून पुरुषांना ' शरण ' व स्त्रियांना ' शरणी ' असे संबोधून धर्म कार्यात सहभागी करून घेतले.याच शरण चळवळीचे पुढे त्यांनी विश्वव्यापक अशा लिंगायत धर्मात रूपांतर केले.त्यामुळे सर्वांच्यात समान पातळीवर ' रोजी - रोटी - बेटी ' व्यवहार सुरू झाला.समता,समानता,सरलता, बंधुत्व ,जातीभेद,लिंगभेद निर्मूलन, निर्मोही,निजमुक्त,
' कायक वें कैलास '( कष्ट करून जगणे व श्रमाने अर्थप्राप्ती करणे ) अनुसरून ' दासोह ' ( जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा अंगीकार करणे ) करणारी ,विवेकवादी व सारासार विचारसरणी जागृत करणारी चर्चा घडवून प्रत्यक्ष अनुभव घेणारी शरण - शरणींची एक मोठी संघटनाच त्यांनी उभी केली.तिलाच त्यांनी ' अनुभव
मंटप ' असे नाव दिले.
' अनुभव मंडप ' सारख्या संघटनेची स्थापना करून त्यांनी क्रौर्य व चौर्य विरोधी विचार प्रणाली रुजवली.त्यामुळे अनेक चोर, लुटारू आपला वाईट मार्ग सोडून शरण आले व अनुंभव मंडप मध्ये सामील झाले.दारू विकणारा म्हाऱय्या आपले वाईट कर्म सोडून वाटसरू यात्रिकांसाठी दूध, ताक,पाणी पुरवू लागला. कायक वे कैलास मुळे श्रम प्रतिष्ठेला महत्त्व प्राप्त झाले. भीक,भिक्षा अथवा विना कर्म फुकट खाणे बंद होऊन श्रम संस्कार रुजले गेले.अनुभव मंडपात जी वचने लिहिली गेली तीच पुढे भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे व स्वातंत्र्य,समता व बंधुता अंगीकार करणारी जीवन मूल्ये ठरली गेली
सदाचारी आचरण करताना कोणाची चोरी,असंग, राग,तिरस्कार, हत्या, खुश मस्करी,परनिंदा नको . अशी वर्तणूक जपली तरच कुडल संगमेश्वर देव प्रसन्न होऊन कृपादृष्टी ठेवेल अशी समाज धारणा तयार झाली.
म. बसवेश्वर जातीभेद निर्मूलन अनुभव देण्यासाठी स्वतः हरळय्या शरण - कल्याणीम्मा शरणींच्या घरी ' दासोह ' ( कष्ट केल्यानंतर चे पोटाचे यज्ञकर्म अर्थात गरजेपुरते आवश्यक जेवण ) करण्यासाठी गेले असता ,अन्न दात्याना त्यांनी ' शरणू - शरणार्थी ' म्हणून दोन्ही हात जोडून नमस्कार केला.तेव्हा या दांपत्याने म.बसवेश्वर यांच्या नमस्कारा मधून उतराई होण्यासाठी पती पत्नीने चर्चा करून हरळय्या यांनी डाव्या व कल्याणीम्मा यांनी आपल्या उजव्या मांडीवर कातडे कमावून व वळून वळून त्यापासून सुंदर सुबक असे डाव्या व उजव्या पायांचे जोडे तयार केले . संपूर्ण जोडे तयार होई पर्यंत त्यांनी त्या जोड्याना जमिनीचा स्पर्श होवून दिला नाही . त्यात दोघांच्याही मांडीचे कातडे पार सोलवटून निघाले . व त्यांना खूप जीवघेण्या यातना सोसाव्या लागल्या पण गुरु प्रेमासाठी त्यांनी त्या सो स ल्या. मग जोडे तयार झाल्यावर त्यांनी ते म.बसवेश्वर यांना भेट दिले.ते जोडे पाहिल्यानंतर व त्या मागची कथा ऐकल्या नंतर म.बसवेश्वर म्हणाले की,हे जोडे कोणत्या पशू पक्षांच्या कातडी पासून बनलेले नसून ते माझ्या शरण शरणीच्या कातडीचे बनलेले आहेत. हे मला माझ्या प्राणा हूनही प्रिय राहतील. असे म्हणून त्यांनी ते जोडे हातात घेवून नमस्कार केला व दोघांना साश्रू पूर्ण नयनांनी हृदयाशी कवटाळ ले. गुरुशिष्य यांचे एकमेका प्रती असलेले महान प्रेम यातून दिसून येते.
म.बसवेश्वर यांच्या या महान कार्यामुळे माझ्यापेक्षा कोणी लहान नाही आणि कुडल संगमेश्वर देवा पेक्षा कोणी महान नाही.ह संदेश सर्वत्र पसरला गेला.त्यामुळे शिवभक्त करलय्या ,शरणय्या,हरळ य्या ,व्यंकय्या, चेन्नय्या, शरण आदय्या, अबीर चांद य्या, घटी वाळ य्या ,माचीदेव माचय्या,बहुरूपी चौंड य्या,बुरुड केतय्या,विदर्भ ढोरकय्या,सोलापूरचे सिद्ध रामेश्वर, मडी याळ माचय्या ,काश्मीर चे महादेव ,अफगाणिस्तानचे मंगरूळ शंकरदेव,महाराष्ट्राचे ओरी लिंगदेव , अक्कमहादेवी असे अनेक मानवतावादी शरण शरणी म.बसवेश्वर यांचे शिष्य बनले
म.बसवेश्वर यांनी ' अनुभव मंडप ' ची स्थापना करून ते श्री अल्लंम प्रभू यांच्या अधिपत्याखाली चालविले.यात एकूण 700 शरण व 70 शरणी असे एकूण 770 साधक सामील झाले. व वेद शास्त्र व धर्म कार्यात स्त्री पुरुष समानता निर्माण झाली . यात निर्वस्त्र अशी व केवळ आपल्या केश संभाराचेच वस्त्र निर्माण करून तेच परिधान करणारी, महान अशी शरणी अक्कंमा म्हणजे शुचिर्भूत दिगंबर साधनेचे मानाचे पान ठरली. अन्यायी राजा कौशिक याने तिच्या स्त्री सुलभ लज्जेला अपमानित केल्यामुळे तिने आपल्या साधनेच्या जोरावर फक्त श्री चेन्न मल्लिकार्जुन देवालाच आपले पती मानले . व सोलापूरचे सिद्ध रामेश्वर तिच्या सर्व देव व अध्यात्म कार्यात मदत करत असत म्हणून त्यांना आपला मुलगा मानले होते. म.बसवेश्वर आणि श्री अल्लम प्रभू यांच्या मुळे तिला 'अक्का ' म्हणजेच सर्वांची थोरली बहीण असा मान मिळाला .तिचे क्रांतिकारी वर्तन व प्रगत विचार यामुळे तिने अनुभव मंडपला वेगळ्या वैचारिक व तात्विक उंचीवर नेवून ठेवले.स्त्री म्हणजे ती नुसती स्त्री नसून ती मोह आहे .पण त्याची पेक्षा ती ' माया ' आहे.माया म्हणजे हृदयाच्या अंतरहृदयातील अप्रतिम कलाकृती.तीच गुप्त मनाची सुप्त जाणीव जागृती असते.असे तिने आपल्या वाचनात निक्षूण सांगितले आहे.तेव्हा अनुभव मंडप च्या कार्यात ती स्वतः 70 शरणींचा आदर्श ठरली. तिचे हे स्त्रीत्वा चे तत्वज्ञान त्या वेळच्या आणि आजच्या काळाच्या कितीतरी पुढे असे प्रगत आहे. एकापेक्षा एक सरस शरण शरणी अनुभव मंडप ने वेदशास्त्र व धर्म अभ्यासाला तयार केल्या.
अशा प्रकारे म.बसवेश्वर यांचे कार्य हे क्रांति प्रवन ठरले. ई.स.1167 ला नागपंचमी न च्या दिवशी म.बसवेश्वर नावाचा मानवतेचा पुजारी ,क्रांतिसूर्य शिवैक्य / लिंगैक्य झाला.
श्री अल्लं म प्रभू यांनी शरण चळवळ व अनुभव मंडप यांचे वर्णन करताना लिहिले आहे की,' कल्याण पूर झाले पणती,त्यात तेल ही भक्ती,आचाराची वळली वाती,अनुभव वचन प्रकाश,बसव ज्योती दिव्य तेज, स्थळ भक्ती सदन, भारत देश परंपरा महान,या श्री घृष्णेश्वर लिंगाचे मज अर्चन ,त्यात झाले मज श्री बसव दर्शन ,श्री बसव दर्शन '.
अशा या म.बसवेश्वर यांच्या लिंगायत धर्म कार्यास म. बसवेश्वर जयंती निमित्त सर्वांना वीरशैव लिंगायत समाज संघटनेच्या वतीने बसवमय हार्दिक शुभेच्छा..हार्दिक शुभेच्छा. शरणू शरणार्थी !
श्री बसवेश्वर महाराज की जय,ओम नमः शिवाय!