महाजंगम - पूज्य श्री डॉ.बसवलिंग पट्टदेवरु
... तोचि साधू ओळखावा
जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले ||
तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा ||
मृदू सबाह्य नवनीत | तैसे सज्जनाचे चित्त ||
ज्यासी आपंगिता नाही | त्यासी धरी जे हृदयी ||
दया करणे जे पुत्रासी | तोचि दासा आणि दासी ||
तुका म्हणे सांगू किती | तोचि भगवंताचि मूर्ती ||
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचे प्रत्यक्ष आचरण पूज्य श्री डॉ बसवलिंग पट्टदेवरु यांच्या नित्य आचरणातून दिसून येते. सर्वस्वाचा त्याग केलेले हे संन्यासी अनाथांचे नाथ झाले. वृध्द, निराधार, अबला यांचे आश्रयदाते झाले. रंजल्या - गांजल्या लोकांना आपल्या पोटाशी धरले. दीन, दलित, उपेक्षित, कष्टकरी, कामगार यांच्या जीवनात सुखाचे नंदनवन फुलविले. त्यांचे मातृहृदय गरीबांचे दु:ख, दारिद्र्य, अज्ञान पाहून द्रवते. सर्वांप्रती समत्व भाव आहे. संत तुकारामांना अभिप्रेत असलेले संतत्व अप्पाजींच्या कार्यातून ओसंडून वाहताना दिसते.
▪️अनाथ मुलांसाठी कोर्टाच्या कठड्यात
चेन्नय्याच्या घरचा दासाचा पुत्र ,
कक्कय्याच्या घरची दासीची पुत्री,
दोघे गोवर्या वेचण्यास गेले असता संग झाला,
त्या दोघांच्या पोटी मी जन्मलो कूडलसंगाच्या साक्षीने..!
महात्मा बसवण्णा या वचनातून समाजाने अनैतिक, अनौरस , दासीपुत्र म्हणून शतकानुशतके जगणे नाकारणाऱ्या समाजातील एका दुर्बल घटकाशी आपल्या जन्माची नाळ जोडून त्यांच्याठायी आत्मसन्मान जाणवतात. महात्मा बसवण्णांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालविणारे पूज्य श्री डॉ बसवलिंग पट्टदेवरु गत तीन दशके निराधार, गरीब, अनाथ , डोंबारींची मुले यांच्या संगोपन व शिक्षणाची जबाबदारी घेऊन करीत असलेले कार्य या बसव विचारांचे प्रत्यक्ष आचरणच होय. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले अर्भक आईला नको असते. आपल्या प्रतिष्ठेपायी ती आपण जन्म दिलेल्या एका दिवसाच्या बाळाला उकिरड्यावर, दवाखान्यात, रेल्वे - बसस्थानकच्या निर्जनस्थळी उघड्यावर टाकून जाते. अशी अर्भके हिंस्र प्राण्यांची शिकार बनतात. त्यातून बचावली आणि माणसांच्या नजरेस पडली तर त्यांचे पुढे काय होते कुणास ठाऊक . परंतु असे नवजात अर्भक असल्याचे वृत्त अप्पाजींना कळले तर, अशा एक - दोन दिवसांच्या अर्भकांना आपल्या गुरुकुलात आणून त्यांचे संगोपन केले जाते. अप्पाजींनी आजपर्यंत अशा पंच्याऐंशी मुलांचे पालकत्व स्वीकारुन त्यांचे संगोपन केले आहे.यात अधिक संख्या मुलींची आहे. त्यातही अपंग, मतिमंद, दृष्टीहीन अर्भकांची संख्या अधिक आहे. नंतरच्या काळात शासनाच्या आदेशाप्रमाणे ती मुलं दत्तक दिली जात आहेत. आजपर्यंत ७० मुलांना दत्तक देण्यात आले आहे. बहुतांश मुले अत्यंत श्रीमंत कुटूंबात गेली आहेत. अप्पाजींच्या मातृहृदयाने अशा अनाथ मुलांना मातापित्याचे छत्र मिळाले. ते चांगल्या संस्कारात वाढले. चांगल्या कुटुंबांनी त्यांना दत्तक घेतले. ते चांगले नागरिक झाले. अन्यथा अशी मुले समाजविघातक कार्याकडे प्रवृत्त होऊन समाजात हिंसा, अन्याय, अत्याचार करीत असतात. अशा मुलांना चारित्र्यसंपन्न नागरिक बनवून राष्ट्र व समाजस्वास्थ्य राखण्यात अप्पाजींची दूरदृष्टी किती महत्वपूर्ण आहे! माणुसकीचे हे काम करताना अप्पाजींना कोर्टाच्या कठड्यात उभे रहावे लागले.
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
अप्पाजी नेहमीप्रमाणे सकाळी वृत्तपत्र वाचत होते. त्यांची नजर एका बातमीकडे गेली. ती बातमी होती, ' निर्जनस्थळी एक नवजात अर्भक सापडले.' ही बातमी वाचताच अप्पाजींचे हृदय कळवळले. क्षणभरातच त्यांच्या मनात, ' त्या नवजात शिशूस आणून गुरुकुलात संगोपन करावे ' असा विचार आला. लगेच त्यांनी गुरुबसवास बोलावून त्या नवजात शिशुचा शोध घेण्यास सांगितले. तसा शोध घेतल्यानंतर तो शिशू पोलिसस्टेशनमध्ये नेण्यात आल्याचे कळाले. अप्पाजींनी पोलिसस्टेशनला फोन करून चौकशी केली. त्या शिशूच्या संगोपनाची जबाबदारी घ्यायचे असेल तर, तुम्हाला ते कोर्टात जाऊन घ्यावे लागेल , असे सांगण्यात आले. अप्पाजी कोर्टात जाण्यास तयार झाले. सोबत एका वकिलास घेऊन अप्पाजी कोर्टात हजर झाले. कोर्टात सहजपणे तो शिशू देतील असे वाटले होते. परंतु, न्यायमूर्तींनी अप्पाजींना कोर्टाच्या कठड्यात उभे रहायला सांगितले. अप्पाजी कोर्ट कठड्यात उभे राहिले. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्या शिशूच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली. तेंव्हा तो शिशू अप्पाजींच्या हातात देण्यात आला. त्या शिशूला आपल्या हृदयाशी धरत असताना नकळतपणे त्यांच्या डोळ्यातून आसवं टपकली. पाहणाऱ्या लोकांचे डोळेही पाणावले. त्या एक - दोन दिवसांच्या बालकात त्यांना खर्या अर्थाने बसव दर्शन झाले. नंतरच्या काळात अशा नवजात शिशूंची संख्या वाढत गेली. बसव सिध्दांताचे आचरण करणाऱ्या अप्पाजींना अनंत कोटी जप, कोटी बिल्वार्चन, लक्ष दीपोत्सव यापेक्षाही अशा अनाथ मुलांचे संगोपन करण्यात अधिक पुण्यप्राप्तीची धन्यता वाटते. अशा अनाथ मुलांप्रती ते किती संवेदनशील आहेत म्हणजे, ते आपला वाढदिवस अशा अनाथ मुलांचा वाढदिवस म्हणून साजरा करतात.
▪️वृध्द निराधार व मनोरुग्ण यांना आश्रय
आज एकत्रित कुटूंब पध्दती लुप्त होत जाऊन , विभक्त कुटुंब पध्दती वाढत आहे. शहरीकरणाचा वाढता वेग आणि संकोचित मनोवृत्ती यामुळे वृध्द आई- वडिलांची हेळसांड होत आहे. आपल्या जीवनाची इमारत उभी करण्यासाठी ज्यांनी स्वत:चे आयुष्य पणाला लावले , अशा आई - वडिलांची त्यांच्याच घरात अडचण वाटू लागली आहे. आपल्या मुलांच्या परकेपणाच्या वागणुकीमुळे अस्वस्थ होऊन अनेक वृध्द जेंव्हा मठात येतात तेंव्हा अप्पाजी त्यांना आपल्या मठात आश्रय देतात. त्यांच्या निवास व जेवणाची व्यवस्था करतात. त्यांचे आरोग्य ठीक नसेल तर त्यांच्यावर डॉक्टरांकरवी उपचार करतात. त्यांच्या मुलांना बोलावून घरातील समस्या विचारतात. त्यांना समजावून सांगतात. त्यानंतर जर त्यांना आपल्या आईवडिलांना घरी न्यावेसे वाटले तर , तशी परवानगी देतात. अन्यथा, मठातच त्यांची व्यवस्था करतात. वृध्दांप्रमाणेच अनेक निराधार, विधवा, मनोरुग्ण मठास येतात. अनेक विधवांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे आपल्या संस्थेत काम देवून , त्यांच्या कुटुंबाचा आधार होतात. त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देतात. निराधारांना आश्रय देतात. मनोरुग्णांना मानसोपचार तज्ञांकडून उपचार करतात. अप्पाजींनी अनेक निराधार मुलामुलींची लग्ने लावून त्यांचा संसारही फुलविला आहे.
▪️विधवांची ओटीभरणी
भारतीय समाज व्यवस्थेने विधवांचे फार हाल केले आहेत. बालवयात झालेले लग्न, व्यसनाधीन असलेला पती , आणि अनेक कारणांमुळे होणारा त्यांचा मृत्यू या सर्वांची शिकार फक्त स्त्री होते. विधवांना पुनर्विवाहाची मान्यता नसल्यामुळे ते आपले संपूर्ण जीवन अत्यंत हलाखीत जगतात. समाजातील कोणत्याही शुभकार्यात त्यांना कोणीही मानसन्मान देत नाही. त्यांची उपस्थिती अशुभ मानली जाते. विधवांच्या भाळी लिहीलेले हे दु:ख , सामाजिक मूकबहिष्कृतता, स्वत:विषयीची करंटेपणाची भावना नष्ट करण्यासाठी अप्पाजी आपल्या अनेक मोठमोठ्या कार्यक्रमात विधवांच्या ओटीभरणाचे कार्यक्रम आयोजित करतात. विधवा महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान केला जातो. त्यामुळे समाजमनात विधवांविषयी असलेली न्यूनत्वाची भावना संपुष्टात येईल असे प्रयत्न केले जातात.
▪️आंतरजातीय विवाह
भारतीय समाजातील जातीव्यवस्था संपुष्टात आणायचे असेल तर, आंतरजातीय विवाह हा एक समर्थ पर्याय असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. याची प्रत्यक्ष कृती महात्मा बसवण्णांनी बाराव्या शतकातच केली होती. हाच आदर्श समोर ठेवून अप्पाजींनी स्वतः पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले आहेत. बसवप्रणीत लिंगायत धर्मात इष्टलिंग दीक्षेनंतर पूर्वाश्रमीची जात नष्ट होऊन ते लिंगायत होतात. या तत्वानुसार आंतरजातीय विवाह करुन घेणार्या दांपत्यांना इष्टलिंगदीक्षा देण्यात येते. त्यानंतर त्यांचा विवाह लिंगायत धर्म पध्दतीने लावण्यात येतो. आजवर सुमारे वीस आंतरजातीय विवाह अप्पाजींनी आपल्या मठात लावून दिले आहेत. जातीयवादी मनोवृत्तीच्या लोकांनी यास विरोधही केला. परंतु, अप्पाजी त्या विरोधाला भीक न घालता , हे महात्मा बसवण्णा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य म्हणून निडरतेने करीत आहेत.
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
▪️दया असावी सकळ प्राणीमात्रांठायी
महात्मा बसवण्णांचा विचार प्रत्यक्ष आचरणात आणणारे अप्पाजी हे सकल जीवात्म्यांंचे कल्याण इच्छितात. सर्व प्राणीमात्रांठायी दयाभाव बाळगतात. यास एक प्रत्यक्ष उदाहरण देता येईल. एकदा भालकी नजीकच्या डोणगापूर येथून एका मोठ्या ट्रकमधून आठ - दहा गायी नेण्यात येत होत्या.अप्पाजी सकाळी वायुविहारासाठी त्याच रस्त्याने गेले होते. त्यांचे लक्ष सहजपणे त्या ट्रककडे गेले . त्यांनी तो ट्रक थांबवून चौकशी केली. त्या सर्व गायी कत्तलखान्यास नेल्या जात होत्या. ते ऐकून अप्पाजींना वाईट वाटले. त्यांनी लगेच त्या सर्व गायी खरेदी केल्या आणि मठातील शेतीच्या गोठ्यात त्या सोडण्यात आल्या,तिथेच त्यांचे संगोपन करण्यात आले नंतर गुरुकुल परिसरात ' शरण तुरुगाही रामण्णा गो शाळा ' सुरू करण्यात आली. याचप्रमाणे भालकी तालुक्यातील केसरजवळगा गावाजवळ थोडेसे वयस्कर बैल नेणार्या दोन ट्रकपैकी एका ट्रकचा अपघात झाला. त्या ट्रकमध्ये नऊ बैल होते. त्यापैकी दोन बैल जागीच मृत्यू पावले. शिल्लक सात बैलांना अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. तीन चार बैलांचे पाय मोडले होते. ही बातमी अप्पाजींना कळाली. त्यांनी आपले प्रतिनीधी त्या जागी पाठवून , ते सात बैल आपल्या गोशाळेत घेऊन आले. दुसऱ्या ट्रकमध्ये जे नऊ बैल होते, ते ही प्रशासनाच्या परवानगीने संगोपनासाठी घेण्यात आले. अशाप्रकारे अप्पाजींनी प्राणीमात्रांठायी दयाभाव व्यक्त केला आहे.
▪️स्वधर्म निष्ठा : परधर्म सहिष्णुता
अप्पाजी हे लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनातील अग्रगण्य मठाधिपती होत. त्यांची संपूर्ण निष्ठा स्वधर्मास समर्पित असली तरी , त्यांनी कधीही अन्य धर्माचा द्वेष केला नाही. श्रीमठात सर्व जाती - धर्मातील लोकांना मुक्त प्रवेश आहे. मठाच्या प्रसाद निलयात सर्व मुलांना प्रवेश देऊन त्यांच्या निवास, भोजनासह शिक्षणाची मोफत व्यवस्था केली आहे.
अप्पाजी आपल्या मठाच्या अनेक कार्यक्रमात सर्व धर्मातील धर्मगुरूंना आग्रहाने आमंत्रित करतात. ते स्वत: अनेकदा बौध्द , मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांच्या कार्यक्रमास जातात. भालकी, बीदर आणि बसवकल्याण येथील कुराण प्रवचने आणि बायबल प्रवचनात अप्पाजी सहभागी होऊन त्या बांधवांना लिंगायत तत्वज्ञानाचा परिचय करून देतात. सातारा येथे परिवर्तनवादी संघटनेच्या वतीने दरवर्षी साजरा होणार्या ' महम्मद पैगंबर जयंती उत्सव ' कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी सर्व समाजाला बंधुत्वाचा संदेश दिला आहे.
जात, धर्म, पंथ, वर्ण आणि लिंग यापेक्षा व्यक्तीच्या ठायी असलेली गुणवत्ता , आचार, विचार महत्त्वाचे असतात. निसर्गदत्त प्रतिभा ही सर्व बंधनातून मुक्त असते हा अप्पाजींचा दृढभाव. कन्नडमध्ये रमजान दर्गा यांनी बसवण्णांविषयी विपुल लेखन केले आहे. त्यांची कन्नडमधील पुस्तके मराठीत अनुवादित करुन प्रकाशित केली आहेत. धर्मांधता आणि जातीयता नष्ट करण्यासाठी अप्पाजी अनेक आंतरजातीय विवाह स्वत: घडवून आणले आहेत. नवलिंग पाटील नावाचा कलावंत आज सुप्रसिद्ध आहे. ते जन्माने मुस्लिम. लहान बालक असताना ते मठात आले. त्यांना आई वडील नव्हते. त्या बालकास इष्टलिंग दीक्षा दिली. शालेय शिक्षणात लक्ष नसल्यामुळे त्यास संगीत शिक्षण दिले. त्याचे लग्न लावून दिले. त्याच्या मुलांना मोफत शिक्षण दिले. ते आज दूरदर्शनवर कार्यक्रम करतात. हास्य कलावंत म्हणून त्यांची ख्याती राज्यभर आहे. अप्पाजींची ही सर्वधर्म सहिष्णुतेची दृष्टी या देशातील राजकारणी आणि समाजधुरीणांनी अवगत केली पाहिजे.
अप्पाजींची ही सर्वधर्म समभावाची वागणूक पाहूनच डॉ मुक्तंबी या मुस्लिम महिलेने ' भालकीय बेळकू ' ( भालकी प्रकाश ) ही काव्यकृती रचली आहे. याशिवाय डॉ मुक्तंबी अध्यक्ष असलेल्या ' अमरावती शिवय्या हिरेमठ प्रतिष्ठान ' च्या वतीने दरवर्षी ' पूज्य श्री डॉ बसवलिंग पट्टदेवरु साहित्य पुरस्कार ' दिला जातो. या घटनेवरून अप्पाजींच्या मनातील सौहार्दतेची साक्ष पटते.
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
▪️साधकांचा मायबाप
पूज्य श्री डॉ बसवलिंग पट्टदेवरु म्हणजे लिंगायत धर्म प्रसाराची सच्ची तळमळ असलेले धर्मगुरू होत. आपण स्वतः चरजंगम होऊन कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यात संचार करीत आहेत. देश - विदेशात बसवतत्व प्रसारकार्य अधिक जोमाने व्हावे , या उद्देशाने त्यांनी धर्मप्रसारकांची एक फळीच निर्माण केली आहे. अप्पाजींचे मातृहृदय, विनम्रवृत्ती सर्वसमावेशक स्वभाव आणि अंतरी अपार बसव निष्ठा यामुळे अनेक युवक अप्पाजींच्या सहवासात आले आणि कायमचे धर्म प्रसारक जंगम झाले. भालकी मठाच्या प्रसाद निलयात शिक्षण घेण्यासाठी आलेला राजकुमार मुलगे नावाचा विद्यार्थी अप्पाजींच्या सहवासात आला आणि सर्वस्वाचा त्याग करुन तो गुरूंच्या सेवेत रमला. त्याचा त्याग सेवाभाव व धर्मनिष्ठा , क्रियाशीलता पाहून अप्पाजींनी त्याला जंगमदीक्षा दिली. आणि आपला उत्तराधिकारी केले. आज तेच श्री गुरुबसव पट्टदेवरु म्हणून ओळखले जातात. बसवकल्याण तालूक्यातील तोगलूर गावातून महादेव सिध्दगोंडा हे संन्यास घेण्यासाठी भालकी मठास आले. अप्पाजींनी त्यांना जंगमदीक्षा देऊन त्यांचे नामकरण पूज्य श्री महालिंगदेवरु असे केले. तेलंगणात बसवतत्व प्रसार करण्यासाठी अप्पाजींनी त्यांना तेलुगू शिक्षण दिले. कोट्यवधी रुपये खर्च करून संगारेड्डी येथे दोन एकर जागा घेऊन तिथे अनुभव मंटप निर्माण कार्य सुरु आहे. महालिंगदेवरु संगारेड्डी येथे राहून तेलंगणात लिंगायत धर्म प्रसार कार्य करीत आहेत. तेलंगण राज्यातील थडीहिप्परगा येथील पूज्य श्री शेषराव महाराज यांनी आपल्या गावात श्री बसवेश्वर मठ बांधला आहे. त्यांचे चिरंजीव बसवराज जुबरे यास अप्पाजींकडूनच जंगमदीक्षा देण्यात आली आहे. त्यांचे नामकरण पूज्य श्री बसवलिंग देवरू असे करण्यात आले आहे. त्यांचे शिक्षण मराठीत झाले आहे.ते महाराष्ट्रात लिंगायत धर्मप्रसार कार्य करीत आहेत.
अप्पाजींची बसवनिष्ठा आणि बसवतत्वाधारित लिंगायत धर्म संस्कारपध्दती पाहून गदगचे जगद्गुरु डॉ तोंटद सिध्दलिंग महास्वामी यांनी अनेक नवोदित मठाधिशांना प्रशिक्षणासाठी भालकी मठास पाठवले आहे. पूज्य श्री गुरुपाद देवरु, पूज्य श्री शिवानंद देवरु,पूज्य श्री निरंजन देवरु, पूज्य श्री मृत्यूंजय देवरु, पूज्य श्री चंद्रशेखर देवरु, पूज्य श्री शिवप्रसाद देवरु हा पूज्य गदग स्वामीजींनी पाठविलेला साधकवृंद आहे.यांनी भालकी मठात तीन - पाच वर्ष राहून लिंगायत धर्म संस्काराचे प्रशिक्षण प्राप्त केले आहे.यातील पूज्य श्री गुरुपाद देवरु व पूज्य श्री मृत्यूंजय देवरु हे मठाधिपती झाले आहेत. पूज्य निरंजन देवरु अप्पाजींकडून जंगमदीक्षा घेऊन प्रवचनाद्वारे धर्मप्रसार कार्य करीत आहेत. पूज्य शिवानंद देवरु जंगमदीक्षा घेऊन बसवकल्याण अनुभव मंटपचे संचालक म्हणून कार्य करीत आहेत. पूज्य श्री मल्लिकार्जुन देवरु व पूज्य श्री रेवणसिध्द देवरू यांनी काही वर्षे भालकी मठात राहून लिंगायत धर्म संस्कार शिकून घेतले. सुलफल स्वामीजींच्या मध्यस्तीने अप्पाजींनी स्वतः सर्व खर्च करून गुलबर्गा जिल्ह्यातील कवलगा येथील विरक्त मठास पट्टाधिकार करुन पूज्य श्री म. नि. प्र. अभिनव षण्मुख महास्वामीजी असे नामकरण केले आहे. तसेच पूज्य श्री रेवणसिध्द देवरू यांना भालकी तालुक्यातील गौरचिंचोळी गावातील सिध्दरामेश्वर मठास पट्टाधिकार करुन, त्यांचे नामकरण पूज्य श्री सिध्दरामेश्वर देवरु असे करण्यात आले आहे. याशिवाय पूज्य अप्पाजींनी गृहस्थ जीवनाचा त्याग करुन संन्यस्थ होऊ इच्छिणाऱ्या अनेकांना जंगमदीक्षा देऊन त्यांच्या खांद्यावर धर्मप्रसाराची धुरा सोपविली आहे. पूज्य शंकरलिंग स्वामीजी हे अप्पाजींकडून जंगमदीक्षा घेऊन हुमनाबाद जवळील धुमनसुरु येथे बसवमुक्तीनाथ आश्रम बांधून बसवतत्वाचे प्रसार कार्य करीत आहेत.
गदग जिल्ह्यातील श्री बसवराज वेंकटापूर यांना जंगमदीक्षा देऊन त्यांचे नामकरण पूज्य श्री बसवराज स्वामी असे केले आहे. ते राज्यभर बसवतत्वावर प्रवचने देतात. पूज्य जयदेव स्वामीजी हे सद्य स्थितीत भालकी मठातच सेवा कार्य करीत आहेत.बसवतत्व प्रसार कार्य करणार्या अनेक युवा प्रवचनकार व मठाधीश यांना अप्पाजींनी सुरुवातीच्या काळात सर्वतोपरी सहकार्य करुन त्यांची प्रतिभा लोकाभिमुख करण्यात फार मोठे योगदान दिले आहे. दोन्ही डोळ्यांनी आंधळे असलेले पूज्य बसवानंद स्वामीजी यांची प्रवचने बिदर जिल्ह्यात आयोजित करुन त्यांना पाठबळ दिले आहे. पूज्य श्री वचनानंद स्वामीजी हे कर्नाटकचे योगगुरू म्हणून राज्यभर परिचित आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या काळातही अप्पाजींनी त्यांना खूप सहकार्य केले आहे. अनेक प्रवचनकारांना आर्थिक सहकार्य करुन त्यांना बसवतत्व प्रसार कार्यात प्रोत्साहन दिले आहे. बिदर जिल्ह्यात पूज्य श्री चेन्नबसव पट्टदेवरु यांच्याकडून जंगमदीक्षा घेऊन बसवतत्व प्रसार कार्य करणाऱ्यांना अप्पाजींनी वेळोवेळी सहकार्य केले आहे. अशा प्रकारे जे निष्ठेने बसवतत्व प्रसार कार्य करतात , त्यांच्या पाठीशी अप्पाजी खंबीरपणे उभे राहतात. म्हणूनच त्यांना ' साधकांचा मायबाप ' असे म्हंटले जाते. बसवकल्याण मध्ये अनुभव मंटप परिसरात बसवतत्वाधारित लिंगायत धर्म प्रसार कार्य करणार्या अशा साधकांचे एक प्रशिक्षण केंद्र सुरू करावे असा अप्पाजींचा संकल्प आहे. त्या दिशेने त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत.
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
▪️उत्तराधिकारीची निवड व पट्टाधिकार
पूज्य श्री डॉ बसवलिंग पट्टदेवरु हे हिरेमठ संस्थानचे मठाधिपती झाल्यापासून आजपर्यंत निरंतर जगाच्या कल्याणासाठी आपला देह कष्टवीत आहेत. ' जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती | देह कष्टविती परोपकारे || ' या संत वचनाप्रमाणे अप्पाजी आपले जीवन परोपकारार्थ व्यतीत करीत आहेत. मन तरुण असले तरी आता ते वयाची सत्तरी गाठत आहेत. पद, प्रतिष्ठा, सन्मान, सिंहासन, मिरवणूक, पालखी, सोन्या - चांदीचा टोप असा कुठलाही बडेजाव न मिरवता , ते अगदी सामान्यांसारखे जीवन जगतात. ते कधीही मठाच्या अधिकारपदाला चिकटून बसले नाहीत. वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केल्यानंतर अप्पाजींनी आपला उत्तराधिकारी म्हणून श्री गुरुबसव देवरु यांची निवड करुन २०१६ साली अत्यंत भव्य स्वरुपात त्यांचा पट्टाधिकार केला. पट्टाधिकारानंतर त्यांचे नामकरण पूज्य श्री गुरुबसव पट्टदेवरु असे करण्यात आले आहे. या घटनेतही अप्पाजींनी परंपरागत उत्तराधिकारी निवडण्याची प्रथा मोडीत काढून नवी वाट चोखाळली आहे.
पूज्य श्री गुरुबसव पट्टदेवरु हे अत्यंत बसवनिष्ठ व क्रियाशील स्वामीजी आहेत. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे शिक्षणासाठी म्हणून भालकी मठाच्या प्रसाद निलयात रहायला आले. शिक्षण घेत घेत ते अप्पाजींच्या सेवेत अधिक रमले. विनम्र वृत्ती, सेवाभाव आणि क्रियाशीलता यामुळे ते अप्पाजींच्या कृपाशीर्वादास पात्र ठरले. निस्सीम गुरुभक्ती, अविरत कायकनिष्ठा,राष्ट्रप्रेम, सेवाभावना,स्वच्छ व निर्मळ मन, सदैव नावीन्याचा ध्यास, समजूतदारपणा, विनम्रता आणि लिंगप्रभूने डोलावे असे बोलणे यामुळे ते सर्वांच्या प्रेमादरास पात्र ठरले. या सर्वांपेक्षा आजच्या या झगमगाटाच्या दुनियेत सर्वस्वाचा त्याग करुन समाजसेवेसाठी समर्पित होण्यास सिध्द झाले, हे या भूमीचे महद् भाग्यच होय. भालकी मठाच्या सर्वांगीण विकासात पूज्य श्री गुरुबसव पट्टदेवरुंचा सिंहाचा वाटा आहे. अप्पाजींच्या कार्याची क्रियाशक्ती होऊन ते कार्य करीत आहेत. अप्पाजींचे सर्व संकल्प सिध्दीस नेण्याचे सामर्थ्य पूज्य श्री गुरुबसव पट्टदेवरुंच्या क्रियाशक्तीत आहे. ते कर्नाटक, तेलंगण व महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध पावलेल्या मठाचे उत्तराधिकारी होऊन उभय सद्गुरूंच्या कार्याला उत्तूंग कीर्तीचा कळस चढवतील यात शंका नाही.
▪️साष्टांग हे करी दंडवत
अप्पाजींच्या कार्याची अथांगता पाहिल्यानंतर सहजपणे संत तुकारामांच्या एका अभंगातील ओळी ओठावर येतात. ' काय वाणू आता न पुरे ही वाणी | मस्तक चरणी ठेवितसे || ' अथवा ' श्री संताचिया माथा चरणावरी | साष्टांग हे करी दंडवत || ' अप्पाजींच्या या उत्तूंग कार्याला अभिवादन करण्यासाठी शासन, समाज व अनेक संघ - संस्था यांनी विविध पुरस्कार देऊन त्यांच्याप्रती असलेला आदर व्यक्त केला आहे. कन्नड भाषा, साहित्य व संस्कृती रक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल कर्नाटक सरकारने २००६ साली अप्पाजींना ' सुवर्ण कर्नाटक एकीकरण पुरस्कार ' देऊन सन्मानित केले आहे. शरण साहित्याचे प्रकाशन आणि प्रसार - प्रचार कार्याच्या सन्मानार्थ अखिल भारतीय शरण साहित्य परिषदेने २००८ साली ' रमणश्री शरण पुरस्कार ' दिला आहे. २०१० साली गुलबर्गा विद्यापीठाने ' मानद डॉक्टरेट पदवी ' देऊन गौरवान्वित केले आहे. २०१२ साली कर्नाटक सरकारने ' कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार ' दिला. २०१६ साली धारवाडच्या मुरुघा मठाने ' मृत्यूंजय महांत पुरस्कार ' दिला आहे. २०२० साली कर्नाटक सरकारने ' बसव राष्ट्रीय पुरस्कार ' देऊन अप्पाजींच्या कार्याचा गौरव केला आहे. अनेक संघ - संस्था व संघटनांनी अनेक पुरस्कार , सन्मानपत्र , पदव्या देऊन अप्पाजींच्या कार्याचा गौरव केला आहे.
▪️जगाला प्रेम अर्पावे
सानेगुरुजींना ' मातृहृदयी ' असे म्हंटले जाते. हेच संबोधन पूज्य अप्पाजींविषयी बोलताना सर्वसामान्य लोक वापरतात. साने गुरुजींनी लिहिलेल्या ' खरा तो एकचि धर्म ' या गीतातील प्रत्येक शब्दास आपल्या सेवेतून कृतिरुप देण्याचे काम पूज्य अप्पाजींनी केले आहे. दीनदलित, गरीब, अनाथ, निराधार, वृध्द, असहाय्य, विधवा, मतिमंद, अपंग, लमाणी, डोंबारी , कामगार, कष्टकरी, मजूर या दुर्बल घटकांच्या जीवनात शिक्षणाचा, विकासाचा, प्रगतीचा नंदादीप प्रज्वलित करण्यासाठी आपले उभे आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या दृष्टीने हेच खरे बसव दर्शन आहे. हाच खरा धर्म आहे. हीच खरी पूजा आहे. साने गुरुजींनी जो प्रेमाचा धर्म सांगितला , तो धर्म आपल्या प्रत्यक्ष जगण्यातून जिवंत ठेवण्याचे काम पूज्य अप्पाजींनी आपल्या निरंतर मानवीय सेवाकार्यातून करीत आहेत. ही लोकाराधनाच त्यांच्या दृष्टीने जंगमत्व आहे. अप्पाजी जंगमत्वाने जगलेले महाजंगम !
✍🏼 लेखक -
💐श.राजेश्वर ब जुबरे ,
तेलंगण.
📞8904638908
📖 प्रकाशक -
💐महाराष्ट्र बसव परिषद ,
हिरेमठ संस्थान ,
भालकी ,
जि. बीदर ,
(कर्नाटक)
✍🏼 संकलन -
🙏🏻श.शिवशरण गोविंदे ,
📞7709030011
ज्ञानदासोही अनुभव मंटप
(सोशल मिडिया )
चपळगाव वाडी ,
ता. अक्कलकोट ,
जि. सोलापूर ,
(महाराष्ट्र )